इलेक्ट्रॉनिक वीज मीटर ग्राहकांसाठी घातक; इलेक्ट्रॉनिक मीटर हद्दपार करा – नागरिकांची ठाम मागणी

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक 18 जुलै) राज्यभरात बसविण्यात येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक वीज मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या मीटरमुळे वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीटर तात्काळ हटवून पूर्वीचे पारंपरिक वीज मीटर पुन्हा बसवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रॉनिक मीटरमुळे वीज वापरापेक्षा अधिक बिल आकारले जात असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. वाढते वीज बिल, आर्थिक भार आणि मीटरच्या अचूकतेबाबत निर्माण झालेला संशय यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत आहे.

ग्राहक हित लक्षात घेऊन शासनाने या मीटरची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची प्रक्रिया तातडीने स्थगित करावी व आवश्यक असल्यास त्याऐवजी पारंपरिक मीटरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

वीज ही जीवनावश्यक सेवा असल्याने ग्राहकांवर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी शासन व संबंधित वीज वितरण कंपनीची आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तातडीने योग्य निर्णय घेण्यात यावा, अन्यथा व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.




