बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी महामोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर
{बौद्ध भिख्खु आणि शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बिहार सरकारला निवेदन देण्यात आले.}

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

नांदेड (दिनांक २५ मार्च) बिहार सरकारने टेम्पल अॅक्ट १९४९ हा कायदा रद्द करून बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी महामोर्चा काढण्यात आला.नवा मोंढा मैदान येथून हजारोंच्या संख्येने निघालेला महामोर्चा दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

येथे बौद्ध भिख्खु आणि शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत बिहार सरकारला निवेदन पाठविण्यात आले.

भारताचा महान राजा सम्राट अशोक यांनी भगवान बुद्ध यांचा विचाराचा प्रचार व्हावा यासाठी विहार येथील गया जिल्ह्यात भगवान गौतम बुद्धाच्या महाबोधी विहाराची स्थापन केली होती. मात्र बिहार सरकारने १९४९ मध्ये बुद्ध गया मंदिर व्यवस्थित नियंत्रणासाठी बुद्धगया टेम्पल अॅक्ट तयार केला.

यामुळे विहाराचे व्यवस्थापन अन्य प्रवर्गातील समुदायाकडे गेले आहे. ज्या प्रमाणे चर्च, गुरूव्दारा, मंदिर याचे त्या त्या समुदायाकडून व्यवस्थापन केले जाते. त्याच पद्धतीने महाबोधी विहाराचा संपूर्ण प्रशासकीय ताबा बौद्ध समुदायाकडे द्यावा, १९४९ हा कायदा रद्द करावा या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू झाले आहे.


या अंतर्गत नांदेडयेथेही मंगळवारी २५ रोजी बौद्ध समाज, भिख्खु संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.
नवा मोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून सकाळी ११ ला सुरू झालेला महामोर्चा महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अन्य महापुरूषांना अभिवादन करून दुपारी भर उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

मोर्चातील समाज बांधवांकरिता प्रत्येक चौकात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली होती.

अंत्यत शांततेत निघालेल्या सदर विशाल महामोर्चात जिल्हाभरातील आणि विदर्भातील हजारो बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते.
