अनुष्का हत्येप्रकरणी न्यायाची मागणी; भीम आर्मी–आजाद समाज पार्टी (का.) चे मुख्यमंत्र्यांना निवेदन
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466
जवाहर नवोदय विद्यालया लातूर अंतर्गत असलेल्या वसतिगृहात शिक्षण घेत असलेल्या इयत्ता सहावीतील निरागस कु. अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (का.) यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव व आजाद समाज पार्टी (का.) युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ राजकुमार भगत यांनी प्रशासनाची तीव्र शब्दांत निषेध करत अनुष्काच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे की, शाळेच्या संरक्षणाखाली असताना एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा मृत्यू होणे ही केवळ दुर्दैवी घटना नसून, ती शैक्षणिक व्यवस्थेच्या गंभीर निष्काळजीपणाची व संवेदनशून्यतेची भयावह परिणती आहे. हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्येस भाग पाडलेले कृत्य, याचा तपास निष्पक्ष, पारदर्शक व वेळेत होणे आवश्यक असूनही प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकरणात चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करावा, मृत अनुष्काच्या कुटुंबाला तात्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, तसेच नोकरीत असलेले प्राचार्य, शिक्षक, वसतिगृह अधीक्षक, कर्मचारी व संबंधित अधिकारी यांना अटक करून निलंबित करावे, अशी ठोस मागणी करण्यात आली.तसेच या प्रकरणाची CID / SIT / CBI मार्फत स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, दोषींना वाचवण्यासाठी जर प्रशासन जाणीवपूर्वक काम करत असेल तर लातूर जिल्हाधिकारी यांच्यावरही कारवाई करावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. लातूर जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांच्या आडून अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे रॅकेट सक्रिय आहे का, याची सखोल चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली.“न्याय हा भीक नाही, तो आमचा हक्क आहे.
अनुष्काला न्याय मिळालाच पाहिजे, अन्यथा हा लढा अधिक तीव्र केला जाईल,” असा इशारा भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव व आजाद समाज पार्टी (का.) युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत यांनी दिला आहे. यावेळी अजय लोखंडे भीम आर्मी पुसद तालुका अध्यक्ष, वैभव सूर्यवंशी भीम आर्मी पुसद तालुका उपाध्यक्ष, राहुल धुळे, करण खंदारे, शांतीशील जाधव, राजाभाऊ गुंजकर, संजय धुळधुळे, अशोक भालेराव, राजकुमार भगत, उपस्थित होते.
