उमरखेड तालुक्यातील धनज येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना
✍️अमोल जोगदंडे (विशेष प्रतिनिधी)

धनज:- उमरखेड तालुक्यातील धनज येथे चैत्र पौर्णिमैचे औचित्य साधून २ एप्रील ला मंगलमय उत्साहाच्या वातावरणात थायलंड येथून आणलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली . सर्व प्रथम सकाळी ध्वजारोहण आणि मानवंदना झाल्यानंतर गावातील मुख्य मार्गावरून धम्म रॅली काढण्यात आली.

यामध्ये लेझीम पथकाने गावकऱ्यांचे लक्ष वेधले.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उद्घघाटक आदरणीय पू. भदंत धम्मसेवकजी महास्थवीर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भिक्षूसंघ अध्यक्ष भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या हस्ते व भिख्खू संघाच्या उपस्थित मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.भंते धम्मसेवकजी महास्थवीर यांनी उपस्थितांना बुद्ध आणि त्यांचा धम्म समजावून सांगितले .दुःख मानवी जीवन हे दुःखमय आहे. तृष्णा :-मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे त्याच्या दुःखाचे कारण आहे. दुःख निरोध :- सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने दुःखाचे निराकरण होते असे प्रतिपादन त्यांनी केले.भगवान बुध्दांनी आपलं जीवन लोककल्याणासाठी खर्ची घातलं. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी चार आर्यसत्ये, अष्टांग मार्ग व पंचशीले सांगितली.

भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्ये- दुःख:- मानवी जीवन हे दुःखमय आहे.
तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे त्याच्या दुःखाचे कारण आहे.
दुःख निरोध :- सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने दुःखाचे निराकरण होते.
प्रतिपद :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग स्वीकारला पाहिजे.
भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली अष्टांग मार्ग
सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
सम्यक संकल्प : म्हणजे योग्य निर्धार, विचार.
सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
सम्यक कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
सम्यक आजीविका वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
सम्यक स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे
धम्माची तीन अंगे-
शीलः धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार.
समाधीः शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला नियंत्रित करणे आवशक आहे. ह्यासाठी समाधी महत्त्वाची आहे.
प्रज्ञाः सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणतीना कोणती संवेदना मिळू लागते.

यास प्रज्ञा असे म्हणतात.आस सखोल प्रवचन पु.भदंत धम्मसेवकजी महास्थवीर यांनी केले.
त्यानंतर भव्य भोजन दानाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी एकता जयभीम क्रांती मंडळ धनज यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी गावकऱ्यांचे आणि समता सैनिक दल शेबांळपिंपरी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचलन अमोल जोगदंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश डोगंरे यांनी केले.यावेळी धनज गावातील सर्व स्त्री पुरुष आणि नवयुवक बहुसंख्येने उपस्थित होते.
